Pages

Thursday, 3 September 2015

राजगड, फुलं आणि बरंच काही...

(पूर्वप्रकाशित: लोकप्रभा ०४-सप्टेंबर-१५)

*** फुललेला राजगड ***

...जून-जुलै महिने तसे कोरडेच गेलेले. आभाळात विखुरलेले फ़ुटकळ ढग पाहून छळ होवू लागलेला. श्रावणातही घन-निळा बरसत नाहीये, तर टळटळीत ऊन आणि घामाच्या धारा लागलेल्या. अश्या वेळी आम्हां ट्रेकर्सना कधी एकदा साडेतीन शक्तिपीठांचं -  श्रीशिवराय, सह्याद्री, सिंधूसागर आणि मॉन्सून – यांचं स्मरण करतोय, दर्शन घेतोय, असं झालेलं. शक्तिपीठांच्या वारीसाठी इतिहासाच्या विलक्षण स्मरणांनी भारलेल्या राजांच्या “राजगड”ला भेट द्यायची होती. त्यातंच, गोनीदांनी राजगडाबद्दल लिहिलेलं एक वाक्य कित्येक वर्ष डोक्यात होतं, की “पावसाळ्यात चला राजगडावर, लक्ष-लक्ष फ़ुलं दाखवतो”. एके दिवशी बाईक्स पिटाळल्या गुंजणमावळात - राजांच्या राजगडचा मॉन्सूनमधला पुष्पोत्सव बघण्यासाठी...
         
भेटला सखा पाऊस...
...नसरापूरला कड़क ऊन पोळून काढत होतं. रस्त्यापल्याड तर शेत पेटलंय की काय असं वाटलं. जवळून पाहिलं, तर बांधावर अग्गदी आगीच्या ज्वाळा असाव्यात अश्या भडक तांबड्या-पिवळ्या पाकळ्या असलेली फुलं होती - “अग्निशिखा” किंवा “कळलावी” नावाची. ही फुलं आकर्षक, पण विषारी असतात. 


बाजूच्या गुंजेच्या शेंगांमधून लालभडक “गुंजा” डोळे मिचकावत खुणावत होत्या. 


“रानतीळ” आणि “विंचवी”च्या घुमटाकार फुलांसोबत, माजलेल्या “टणटणी”च्या पानं-कळ्या-फुलांमधली ‘सिमेट्री’ चकित करून गेली...

     



             
...विंझरपासून राजगडाकडे वळलो, तेंव्हा आभाळ गच्च भरून आलेलं. हवा कुंद झालेली. गडाचा बालेकिल्ला कुठेतरी ढगात हरवलेला. 


कानंदी-गुंजवणी नद्यांचं फुफाटणारं पाणी पाहून पावसाची गाठ-भेट पडू शकेल, अशी आशा वाटू लागली. तळ्याच्या काठाशी गवतामधून तरंगत होती “चिरे आमरी (ग्राऊंड ऑर्किड्स्) नावाची विलक्षण बोलकी फुलं...

            
...समोर होता अरुंद वळणां-वळणांचा रस्ता. अन, एका क्षणी अनपेक्षितरित्या समोरून आली लपेटदार वळण घेणारी यष्टी बस. डबक्यातल्या तांबटलाल चिखलपाण्याचा फवारा उडवत निघून गेली. कटकट नाहीच, होता फक्त आनंदच! मावळातल्या लाल मातीत मिसळून गेल्याचा, एक-रूप झाल्याचा!!!

           
...आता आसमंतात दरवळत होता एक अवीट सुगंध - आमच्या मावळातल्या घमघमणाऱ्या भाताचा! 

         
आणि, चहूबाजूंना शेता-शिवारात उचंबळत होत्या रंगीबेरंगी लाटाच-लाटा – एकीकडे हिरवाकंच भाताच्या रोपट्यांच्या लाटा, दुसरीकडे खाचरांमधून खेळवलेल्या मातकट पाण्याच्या लाटा आणि मधल्या बांधावरच्या ‘मिकी माऊस’सारख्या दिसणाऱ्या “कवला” (स्मिथीया) नावाच्या लक्षावधी देखण्या फुलांच्या लाटा...

           
...राजगडच्या अग्गदी कुशीत पोहोचलो, तेंव्हा मात्र ज्याची खूप वाट पाहिली, त्या सख्या पाऊसाने दमदार स्वागत केलं. पावसाला मनसोक्त भेटावं, म्हणून बाईक बाजूला घेतली. जोरात कोसळणारी सर ताड-ताड कोसळू लागली. नखशिखांत भिजवून गेली. “पाऊस खूपंच आहे रे”, असं कुरकुरणाऱ्या मित्राला म्हणलं, "Don't worry. Human body is insoluble in water." खिदळायला परत एक निमित्त मिळालं होतं...
             
....पाऊस थोडका उणावला. अवघ्या गवताळ माळावर तजेलदार तृणपाती तरारलेली. “कुर्डू” आणि “मंजिऱ्या” नावाच्या या तुऱ्याच्या रंग–गंध-चवीवर भुललेल्या भुंग्यांची आणि फुलपाखरांची एकंच लगबग लागून राहिलेली. 

         

            
वाऱ्याचा जोरात झोत आला आणि गवतामध्ये कुठलीशी नक्षत्र लुकलुकली. आमचं भाग्य थोर, की आम्हांला बघायला मिळाली होती "उड़ीचिरायती"ची स्वर्गीय फुलं!!!
                
राजगडावर उत्सव – फुलांचा...
प्रत्येकवेळी राजगडवारी वेगळ्या वाटेने करायची, म्हणून आम्ही चढणार होतो पालखिंडीतून संजीवनी माचीकडे. लांबच्या प्रवासाने शिणलेले ढग पालखिंडीत विसावले होते - मस्त जादुई माहोल! 

           
पाण्यात निथळणाऱ्या चमकदार कळ्या आणि आकाशी-निळ्या रंगाच्या पाकळ्यांच्या फुलांच्या “भारंगी”ला दाद दिली आणि उभ्या धारेवरुन पाऊलवाट चढू लागलो. 

     
भिजू नये म्हणून नाही, तर वाऱ्या-थंडी-पावसात अंगात ऊब टिकून राहावी म्हणून अंगावर पावसाळी जर्कीन चढवलेलं. तरीही नखशिखांत भिजलेलो. 

       
गच्च-दाट ढगांमुळे १० फुटांपलिकडे काही दिसेना. ढगांच्या पार्श्वभूमीवर “हिरव्या निसुर्डी”च्या फुलांचे गुच्छ वाऱ्यासोबत डोलत होते. 

           
कारवीच्या कळ्या डवरल्या होत्या. रानात लवकरच कारवी घमघमणार होती. उंच कारवीच्या झुडुपांच्या कॅनोपीमधून सळसळ आडवी जाणारी वाट पाहून ट्रेकर्स खूष.

 
                                
आता उभ्या उभ्या चढ़ावर धाप लागली म्हणून थबकलो. उभ्या डोंगरउतारावर चिमुकली झुडपे दाटलेली. निळसर पाकळ्यांची महिरप आणि ब्रशचे सहज फटकारे मारावेत असे - पराग.. याचं नावदेखील किती काव्यात्मक - "नभाळी". 

 
पलिकडे एक अत्यंत मजेशीर फूल उमलेलं – “हळुंदा” त्याचं नाव. दोन उभ्या अन एक आडवी पाकळी – एखाद्या किटकाला निवांत बसता यावे अशी रचनेची. खरी मजा या फुलाच्या किटक फुलावर बसला, की अक्षरशः काही सेकंदात आडव्या पाकळीच्या आतून चक्क एक सोंड बाहेर येते. किटकाच्या हालचालीमुळे या सोंडेवरील स्त्रीकेसर-पुंकेसरांचं परागीभवन होतं आणि कीटक उडून गेला की हळुंदाची ही सोंड परत पाकळीच्या आत लुप्त होते. निसर्गाच्या या अनोख्या चमत्काराला मनोमन वंदन केलं...


             
...एव्हाना वाऱ्याचा फुफाटा रौद्र झालेला. शेवाळलेले झाडांचे बुंधे बाजूला टाकत, चिखलाळलेल्या बुळबुळीत वाटेवरून, ढगांची विलक्षण झुंबड अनुभवत, एकेक पाऊल रोवत हळूहळू राजगडची चढाई करत होतो. 

     
उजवीकडची दरी किती खोल कोसळलीये किंवा तासाभराची चढाई होवूनही संजीवनी माचीपाशी पोहोचायला अजून किती वेळ लागेल, याचा थांगपत्ता लागत नाहीये. “पिवळा तेरडा”, “रानहळद” आणि “रानआल्या”च्या तुऱ्यांचे कवतिक करत, छोट्याश्या कातळटप्प्यापाशी आलो. 





     
आमची चढाईची वाट तोरणा आणि राजगड यांना जोडणाऱ्या जुन्या मार्गावर असल्याने, कातळावर कातळकोरीव पावठ्या गवसल्या, अन चढाई सोप्पी झाली. आणि अवचित एका क्षणी समोर उभी ठाकली संजीवनी माचीची बुलंद तटबंदी!!!

...दाट ढगांच्या लाटांच्या दुलईतली संजीवनीची नागमोडी तटबंदी न्याहाळत आडवी वाट चालू लागलो. सोबतीला होते - शुभ नाजूक बाहू पसरलेल्या “पंद” फुलांचे घोस;  आभाळाचं प्रतिबिंब उतरलं असावं अश्या नाजूक पाकळ्या असलेली “दवबिंदू” नावाची फुलं आणि हलक्या मंद आकाशी पाकळ्या आणि गाभ्यामध्ये चांदणीसारखी हलकी जांभळी छटा असलेल्या “निसुर्डी”ची नक्षी!
  
                   

   

...गडाच्या करकरीत तटबंदीवर “सोनकी”ची पिवळी चिटुकली फुलं जिथे-तिथे बहरली होती. आळूदरवाज्याच्या उंबऱ्याला दंडवत करताना, कोणी जिवलग भेटल्याचा आनंद झाला. 




पावसा-वाऱ्याने कित्ती गारठलो होतो, पण तरीही संजीवनीच्या नागमोडी चिंचोळ्या तटबंदीमधून चालताना गडाच्या कुशीतली ऊब जाणवत होती. एकीकडे जुनी ओळख पटत होती, पण असं असलं तरीही गडाचं नाविन्य आणि कवतिकदेखील सरत नव्हतं...


...पाऊस एव्हाना अंगात भिनलेला. ढगांच्या लाटांमधून भटकताना त्यांचा हलका तिखट गंध-स्पर्श नासिकाग्रासास जाणवत होता. खोल श्वास घेवून तो ऊरात साठवून घेतला. 

   
व्याघ्रमुखापाशी पोहोचलो तेंव्हा पाऊस नव्हता, पण ढगातले स्वैर बाण हवेत मुक्तपणे उधळलेले आणि पाण्यावर थरकत होते. आणि, दोस्तांबरोबर रानफुलांवर आणि दुर्गस्थापत्यावर गप्पाष्टक रंगलेलं…


मऊमऊ मातीवर थबकलेल्या पाण्यातून चुबुक चुबुक करत, आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. ‘जाईन विचारीत रानफुला’ अश्या ओळी गुणगुणताना समोर आलेल्या  “निळ्या चिरायती”च्या विलक्षण नाजूक देखण्या फुलांनी खिळवून ठेवलं. 

     
कातळामधल्या जेमतेम मातीच्या आधारावर “सीतेची आसवे” नावाची चिमुकली फुलं उमललेली. इतकी नाजूक फुलं कीटकभक्षी असतात, यावर विश्वास बसेना...

...संजीवनी माचीचे तीन टप्पे हळूहळू चढत बालेकिल्ल्याजवळ पोहोचलो, अन आभाळ-माया ओसंडून वाहू लागली. रिमझिम रेशिमधारा अलगद बरसू लागल्या. काळ्याकभिन्न कातळभिंतीला मॉन्सूनचे ढग ढुशा देत होते, लगट करत होते, रिते होत होते अन विखरून जात होते. परत पुढची ढगांची लाट तयारंच असायची. एरवी रौद्र भासणाऱ्या बालेकिल्ल्याच्या कातळावर आता मात्र जलौघ पाझरत होते. रुणझुणणाऱ्या पाण्याच्या धारांचा अवीट नाद घुमत होता. कातळावर “पाणतेरडा” आणि “कापरू”चे गुच्छ बिलगलेले आणि टिकून राहिलेले. 

     


अवचित एके क्षणी पाऊस उणावला, वाऱ्याचा झोत आला आणि एक जादुई क्षण आला - अवघ्या आसमंतात थेंबांची ‘फुलपाखरे’ उधळली, विखुरली, चिंब करून गेली...

...गारठ्यात दात थडथडू लागलेले. दोन चहा पिऊनही समाधान नाहीच. पण, शांत समईच्या प्रकाशात उजळलेल्या आई पद्मावतीला दंडवत घातल्यावर ऊब जाणवली. शिवराय-सह्याद्री-मॉन्सूनच्या ओढीतून आम्ही राजगडाकडे धाव घेतली होती. त्यामुळे गडपुरुष सुखावत असेल... 


...नेहेमीच ज्याचा त्रास होतो, ती एक गोष्ट अर्थातच खुपत होती. पिकनिकछाप पब्लिकनी आपल्या परीने जास्तीत जास्त कचरा केला होता. दीड-दोनशेच्या संख्येने ट्रेक्स काढणाऱ्या ग्रुप्सचा सुगीचा हंगाम. गडावर माकडचाळे करणाऱ्याना ऊत आला होता. हल्ली कोणालाच ग्यान नको असतं, पण अश्यांनी संवर्धन वगैरे प्रयत्न जरी केले नाहीत तरी हरकत नाही. पण, कृपा करून आमच्या सह्याद्रीला दुखावू नका. सह्याद्रीचं सृजन पुन: फुलायला डवरायला समर्थ आहे...

....पद्मावती तळ्याच्या निळ्यारेशमी पाण्यावरची थेंबांची नक्षी पाहून मन प्रसन्न झालं. 
....बालेकिल्ला अन तळी-टाकी-जोती असं सारं काही चिंब भिजले होते, ढगात हरवले होते. सुवेळा माचीकडे जाताना ‘वाऱ्याने हलते रान’ची अनुभूती आली आणि रंगांच्या रानात हरवून गेलो. "Rubiaceae", "केणा" आणि "फूलकांडी"ची फुलं रानात बहरलेली. 

   

   


झाडांची खोडं शेवाळलेली. खोडाला बिलगलेल्या आमरीचे (ऑर्किड) झुबके पाहून मन लोभले. 

     
काळेश्वरी बुरुजापाशी शंखनितळ पाण्यावर वाऱ्यासोबत येणारे नाजूक तरंग अनुभवत बसून राहिलो. सरीवर सर येत राहिल्या, येतंच राहिल्या. आणि, शिवराय-सह्याद्री-मॉन्सून अश्या शक्तिपीठांच्या उर्जेच्या अनुभूतीने आम्ही भारावून गेलो. मनात भटकंतीचे सारे क्षण रुंजी घालू लागले,
पाचूचं हिरवं माहेरअन ओथंबलेलं आभाळ
वळणवेडा रस्ता, राजांच्या मावळातला
भात खाचरे घमघमणारी, चिंब पालवी सळसळणारी
थेंबांची नक्षी, अन लोभस चिमुकले पक्षी
फुफाटलेली नदीअन गूढरम्य ती दरी…   
निसरड्या पाऊलवाटा, अन चुकणारा काळजाचा ठोका
थरथरणारी पानं, अन गारठवणारं वारं
उत्सव अनवट सौंदर्याचाउत्सव नाजूक रानफुलांचा… 
उसासणारे तटबुरुज, अन गतवैभवाची सय
नखशिखांत भिजलेलं गात्र, पण मन मात्र तृप्त… 
भटकंती उत्कट क्षणांचीभटकंती मनसोक्त आनंदाची
अनुभवला होतो... राजगड, फुलं आणि बरंच काही


 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

महत्त्वाच्या नोंदी:
१. कृतज्ञता: डॉ.  संदीप श्रोत्री, श्रीकांत इंगळहळळीकर यांची सह्याद्रीतील पुष्पसंपदेवरील पुस्तके 
२. छायाचित्रे: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१५. सर्व हक्क सुरक्षित.

20 comments:

  1. अबबब... केवढी सखोल माहिती दिलीस...
    इतक्या वेळा ही सगळी फुलं बघितली पण कधीही त्यांची नावं काही केल्या कळत नसे...
    ह्या लेखाद्वारे सह्याद्रीतल्या अनोळखी फुलांची जबरदस्त माहिती मिळाली...
    तुझ्या राजगडावरील पुष्प संशोधनाला आमच्या सगळ्यांकडून मानाचा मुजरा __/\__
    असेच नवीन नवीन लेखन करीत रहा...
    बढ़िया...
    धनुर्वाद...

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू::
      धन्यवाद :)
      सह्याद्रीच्या नकाशात रमल्यामुळे, ट्रेकमध्ये भेटणाऱ्या जैववैविदध्याची ओळख फारशी नाहीये..
      म्हणून निदान नेहमी खुणावणाऱ्या फुलाला "निळ रानफूल" न म्हणता, "जांभळी चिरायत" म्हणून ओळखता याव यासाठी छोटा प्रयत्न केलाय..
      धन्यवाद :)

      Delete
  2. वाह साई, मस्त माहिती फुलांबद्दल ... महत्वाचं म्हणजे प्रत्येक फुलाचा फोटो आणि नाव टाकल्याने ब्लॉग उत्तम झालाय

    ReplyDelete
    Replies
    1. Vinit:: अरे, एका राजगडच्या भेटीत
      कॅमेऱ्यात टिपलेल्या 30-35 फुलांची - ह्या छोटया सवंगड्यांची फ़क्त नाव शोधली. अर्थात, त्यांचा अभ्यास हा PhD चा विषय आहे...
      धन्यवाद :)

      Delete
    2. Vinit:: अरे, एका राजगडच्या भेटीत
      कॅमेऱ्यात टिपलेल्या 30-35 फुलांची - ह्या छोटया सवंगड्यांची फ़क्त नाव शोधली. अर्थात, त्यांचा अभ्यास हा PhD चा विषय आहे...
      धन्यवाद :)

      Delete
  3. Khupch Chan lekh n info. Pratyaksh bhet dilyasarkhe vatle.

    ReplyDelete
    Replies
    1. Mrudula::
      ब्लॉगवर स्वागत...
      सह्याद्रीच्या अनवट रानफुलांचा फोटोब्लॉग तुम्हांला आवडला, हे वाचून आनंद झाला.. धन्यवाद!

      Delete
  4. Khupch Chan lekh n info. Pratyaksh bhet dilyasarkhe vatle.

    ReplyDelete
  5. Khupch Chan lekh n info. Pratyaksh bhet dilyasarkhe vatle.

    ReplyDelete
  6. Replies
    1. Vivek Kale सर: भटकताना सह्याद्रीचा पुरेसा अभ्यास करा, असं तुम्ही एकदा सांगितलेलं... म्हणून केलेला हा छोटा प्रयत्न... छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून.. :)

      Delete
  7. साई ईतकी नेमकी माहीती अभ्यासपूर्वक शब्दांमध्ये गुंफण्याचे काम तुच करू जाणे! ग्रेट! असेच सौंदर्य ऊधळत रहा आणि आम्हास चिंब करत रहा!

    ReplyDelete
    Replies
    1. तुषार:
      पावसातला राजगड आणि तो अनुभवताना रानफुलांशी ओळख यांच्यासोबत जस्स वाटलं, तेव्हडच लिहायचा प्रयत्न केलाय. खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून... धन्यवाद! :)

      Delete
  8. खूप छान माहिती :)

    ReplyDelete
    Replies
    1. यो,
      अरे, इतक्या वर्षात या फुलांची तोंडओळखसुद्धा करून नव्हती घेतली, म्हणून अनोळखी नाराज होती ही फुलं.
      ही फक्त मराठी नावं शोधली. botanical नावं बघून बोबडी वळली ;) :D
      धन्यवाद!

      Delete
  9. साई, फुलांची खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद असेच ब्लोग लिहित रहा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल... :)

      Delete
  10. दादा राजगडावरील मनाला भुलवणारे या फुलांची नावं
    आज तुमच्याकडून समजली
    पुढील राजगड भटकंती दरम्यान नक्कीच प्रत्येक फुल
    न्याहाळून पाहील...!
    छान माहिती पुर्वक लिखाण...!

    ReplyDelete
  11. दादा राजगडावरील मनाला भुलवणारे या फुलांची नावं
    आज तुमच्याकडून समजली
    पुढील राजगड भटकंती दरम्यान नक्कीच प्रत्येक फुल
    न्याहाळून पाहील...!
    छान माहिती पुर्वक लिखाण...!

    ReplyDelete